शासकीय शाळांचा दर्जा उंचावून स्मार्ट शाळा करण्यासाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात १२ शिक्षक व २ केंद्रप्रमुखांचा सन्मान

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:- 11 सप्टेंबर 2025
“जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा संकल्प असून खाजगी शाळांपेक्षा शासकीय व अनुदानित शाळा अधिक दर्जेदार व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दर्जेदार शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुरुकिल्ली आहे आणि यामध्ये शिक्षकांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 चे वितरण व सत्कार सोहळा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पार पडला. या सोहळ्यात जिल्ह्यातील १२ गुणी शिक्षक आणि दोन केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला.
मान्यवरांचे विचार
कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शिक्षक हीच समाजाची खरी ताकद असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी असून यामुळेच जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावेल,” असे ते म्हणाले.
आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात (Artificial Intelligence) विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आमदार रामदास मसराम यांनी शाळांना भौतिक सुविधा, आधुनिक शैक्षणिक साहित्य व प्रयोगशील उपक्रमांसाठी लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित केली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी “विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन समाजात मोठ्या पदांवर पोहोचताना पाहणे, हीच शिक्षकांची खरी कमाई आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
पुरस्कारप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख
या सोहळ्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या १२ शिक्षकांसह २ केंद्रप्रमुखांना पुरस्कार देण्यात आले.
शिक्षक: बालाजी हनमंत मुंडे (कुरखेडा), वनश्री अंबादास जाधव (गडचिरोली), प्रिती नवघडे (चामोर्शी), शितल कुमरे (कोरची), प्रविण यादव मुंजुमकर (देसाईगंज), हेमलता आखाडे (आरमोरी), सिंपल मुधोळकर (एटापल्ली), उज्वला बोगामी (भामरागड), मुराली गाईन (मुलचेरा), सुरेखा मेश्राम (अहेरी), रमेश रच्चावार (सिरोंचा), विलास दरडे (धानोरा).
केंद्रप्रमुख: गुरुदास गोमासे (चामोर्शी) व संध्या मोंढे (धानोरा).
- पुरस्कारप्राप्त शिक्षक उज्वला बोगामी यांनी दुर्गम भागातील आव्हानांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तर प्रविण मुंजुमकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून शिकविण्याची गरज अधोरेखित केली.
सोहळ्याची रूपरेषा
या सोहळ्यात प्राचार्य बळीराम चौरे, कार्यकारी अभियंता विनोद उध्दरवार, जिल्हा कृषी अधिकारी किरण खोमणे, उपअभियंता नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम व धनंजय दुम्पेट्टीवार यांनी केले. आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी जितेंद्र साहाळा यांनी मानले.
–✍️ संपादक – विदर्भ न्यूज 24