# बूथ पातळीवर संघटना मजबूत करा; येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचाच विजय — जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

बूथ पातळीवर संघटना मजबूत करा; येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचाच विजय — जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे

Amazon.in/ONLINE SHOPPING

सिरोंचा (विदर्भ न्यूज 24) दिनांक 12 ऑगस्ट 2025
सिरोंचा तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक चळवळ वेगाने बळकट करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी केले. धर्मराव महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडलेल्या तालुका विस्तार बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

बारसागडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, पक्षाची ताकद बूथ पातळीवर तयार होत असते. प्रत्येक बूथप्रमुखासोबत ११ युवा कार्यकर्त्यांची नियुक्ती करून, घराघरात संपर्क साधत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. “आपण व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास आगामी निवडणुकांमध्ये आपला विजय अटळ आहे,” असे ते ठामपणे म्हणाले.

त्यांनी गटबाजीला फाटा देण्याचेही कार्यकर्त्यांना आवाहन केले. “माझ्या कार्यकाळात गटबाजीला स्थान नाही; पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समान महत्त्व दिले जाईल. आपल्या एकजुटीने आणि मेहनतीने जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता प्रस्थापित करणे हे आपले लक्ष्य आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की, सत्ता मिळाल्यास आपल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडता येतील आणि त्यावर तोडगा काढता येईल.

— डॉ. नामदेव उसेंडी यांचे मार्गदर्शन।                                          बैठकीत उपस्थित असलेल्या माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते नामदेव उसेंडी यांनी सिरोंचा तालुक्याची संपन्नता आणि त्याच्या विकासातील उणिवा यावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, हा तालुका जलसंपदा, वनसंपदा आणि खनिज संपत्तीने समृद्ध असला तरी, जिंगनूर–रेगुंट्यासारख्या भागाचा विकास झालेला नाही ही दुर्दैवी बाब आहे.
“स्थानिक प्रतिनिधींनी ठोस पाठपुरावा करून विकासकामे वेगाने राबवावीत. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधल्याशिवाय येथील नागरिकांचा दर्जा उंचावणार नाही. मात्र, विकास झाला तर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड पाठिंबा मिळेल,” असे उसेंडी म्हणाले.

रमेशजी भुरसे यांची योजना माहिती।                                      भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
“मोदींच्या नेतृत्वाखाली देश आज वेगाने प्रगती करत आहे. कार्यकर्त्यांनी या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांना भाजपाच्या कार्याचा थेट अनुभव मिळवून द्यावा. घराघरात संवाद वाढवा आणि जनतेशी विश्वासाचे नाते जोडा,” असे ते म्हणाले.

—भव्य स्वागत व उत्साही उपस्थिती

कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे तालुक्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत व सत्कार केला. संपूर्ण सभागृहात घोषणांचा गजर आणि उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत यांनी केले. या बैठकीस मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

-सिरोंचा तालुका विस्तार बैठकीतून भाजपने आगामी निवडणुकांसाठीची रणनीती स्पष्ट केली आहे.बूथ  पातळीवर संघटना मजबूत करणे, गटबाजीला फाटा देणे आणि जनतेशी थेट संपर्क साधणे या तीन मुद्द्यांवर पक्ष आता अधिक काटेकोरपणे काम करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Sandeep Racharlawar

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker