धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक :–08सप्टेंबर 2025
केंद्र शासनाच्या धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘आदि कर्मयोगी’ उत्तरदायी शासन कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण गडचिरोली येथे संपन्न झाले.
दिनांक ४ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे झालेल्या या तीन दिवसीय District Process Lab (DPL) प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविशांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी रणजीत यादव, कुशल जैन यांनी केले.
धरती आबा अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग (झारखंड) येथे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाली. तर महाराष्ट्रात या अभियानाच्या प्रचार-प्रसार उपक्रमाचे उद्घाटन १६ जून २०२५ रोजी माननीय मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते झाले.
या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ३२ जिल्हे, २१४ तालुके व ४,९७५ गावे निवडण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुके व ४११ गावे या उपक्रमात समाविष्ट असून, २,००,८४८ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभ शंभर टक्के पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
अभियानांतर्गत केंद्र शासनाने १७ विभागांच्या माध्यमातून २५ योजना राबविण्याचा आराखडा आखला असून, त्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, पंचायत, वन, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण व आदिवासी विकास विभाग यांचा समावेश आहे. स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग यात आहे.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मास्टर ट्रेनर्स नितीन पाटील, योगेश वैद्य, रवी आत्राम, विक्रम सटाले, गजानन भांडेकर,प्रवीण पाटील, अखिल श्रीरामवार व माधव मडावी यांनी मोलाची भूमिका बजावली.
या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात बहुस्तरीय क्षमता विकास घडवून आणत उत्तरदायी शासन व्यवस्था उभारण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.